संपूर्ण अंदमान मान्सूनने व्यापले   

मालदिव, बंगालच्या उपसागरातही प्रगती

पुणे : मान्सूनचे दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाल्यापासून मान्सूची प्रगती कायम आहे. पोषक वातावरणामुळे शनिवारी दक्षिण समुद्रातून अंदमानपर्यंत प्रवास मान्सूनने पूर्ण केला आहे. मान्सूनची पुढील वाटचाल सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) दक्षिण अरबी समुद्र, मालदिव आणि कोमोरीन क्षेत्राच्या काही भागात. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटे आणि अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात  पुढे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सूनचा पुढील प्रवासही वेगाने होणार असून येत्या २७ मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
दरम्यान, विदर्भात पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. पुढील तीन दिवस मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. पुणे, सातारा जिल्हा व घाट विभागात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. तसेच अहिल्यानगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुणे, सातारा, अहिल्यानगर, सांगली जिल्ह्यांसाठी ऑरेज अलॅर्ट कायम आहे.  
 
आज (रविवारी) धुळे, नाशिक या भागात पाऊस पडणार आहे. या भागात ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहे. या जिल्ह्यांना यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. पालघर, उत्तर व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तसेच मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड वगळता उर्वरित भागात पाऊस पडणार आहे. चार दिवसानंतर राज्यातील काही भागातील पाऊस थांबणार असल्याचा अंदाज आहे. मात्र संपूर्ण राज्यभरात ढगाळ वातावरण कायम असणार असल्याने तपमानात मोठी वाढ होणार नसल्याचेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
पुण्यासाठी यलो अलॅर्ट 
 
पुणे शहर व परिसरात पुढील ४८ ताशी आकाश अंशत: ढगाळ असणार आहे. मेघगर्जना, वीजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार आहे. तसेच काही भागात हलका पाऊस पहणार आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहणार असल्याने पुणे शहर व परिसराला यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे तपमान घटले असून उकाडा नाहीसा झाला आहे. पुढील चार दिवस तपमानात वाढ होणार नसल्याचा अंदाज आहे. 

Related Articles